चालू घडामोडी : 01 November 2019
ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन
- ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे आज (गुरूवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
- त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि सूना असा परिवार आहे.
- त्यांच्यानावावर १०० पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. याशिवाय त्यांनी कथा,कांदबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाचे काम केले आहे.
- साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांचे निधन
- देशातील कामगार चळवळीतील अध्वर्यूपैकी एक असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
- ते ८३ वर्षांचे होते.
- १९८५ सालापासून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दासगुप्ता यांची तीन वेळा राज्यसभेवर, तर दोन वेळा पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवड झाली होती.
- दासगुप्ता यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३६ रोजी सध्या बांगलादेशात असलेल्या अविभाजित बंगालच्या बारिशाल जिल्ह्य़ात झाला होता.
- विभाजनानंतर ते त्यांचे आईवडील व भावंडे यांच्यासह पश्चिम बंगालमध्ये आले.
- त्यांनी १९५०च्या दशकात अविभाजित बंगाल प्रांतिक विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम पाहिले आणि अनेकदा भूमिगत झाले.
- १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) स्थापन झाल्यानंतर दासगुप्ता यांनी मूळ पक्षात राहणे पसंत केले.
- नंतर १९७०च्या सुरुवातीला त्यांना संघटित व असंघटित कामाला असलेल्या मजुरांमध्ये काम करण्यासाठी पक्षाच्या कामगार आघाडीत पाठवण्यात आले.
- २००१ साली भाकपची कामगार संघटना आघाडी असलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीसपद स्वीकारलेल्या दासगुप्ता यांना, फारशा माहीत नसलेल्या या संघटनेला देशातील आघाडीची कामगार संघटना बनवण्याचे श्रेय दिले जाते.
- दासगुप्ता हे कट्टर कम्युनिस्ट असले, तरी ते पुराणमतवादी नव्हते आणि त्यांचे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. संसदेत ते एक चांगले वक्ते म्हणून ओळखले जात.
Olympic Test Event : शिव थापा-पुजा राणीला सुवर्णपदक
- टोकियो शहरात सुरु असलेल्या ऑलिम्पिक सराव स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी चांगली कामगिरी केली आहे.
- पुरुष गटात भारताच्या शिव थापाने ६३ किलो वजनी गटात तर महिलांमध्ये पुजा राणीने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं आहे.
- याचसोबत ६९ किलो वजनीगटात भारताच्या आशिषला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
- ४ वेळा आशियाई खेळांचं विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव वर ५-० ने मात केली.
- दुसरीकडे पुजा राणीने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
- मात्र भारताच्या आशिषला ६९ किलो वजनी गटात जपानच्या सेवॉन ओकाझावाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
दहशतवादाविरुद्ध भारत-जर्मनी एकत्र
- दहशतवाद ही जागतिक आपत्ती आहे, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवाव्या आणि आपल्या देशाच्या भूमीचा वापर अन्य देशांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी होणार नाही याची सर्व देशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भारत आणि जर्मनीने शुक्रवारी संयुक्तपणे केले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जर्मनी भारतासमवेत आहे, काश्मीरबाबत मोदी यांचे म्हणणे आपण प्रथम ऐकून घेणार आहोत, असे जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल म्हणाल्या.
- मर्केल भारत दौऱ्यावर आल्या असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. मोदी यांच्यासमवेत आणखी एकदा चर्चा होणार असून त्या वेळी आपण त्यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा करणार असल्याचे मर्केल यांनी जर्मनीच्या माध्यम प्रतिनिधींना स्वतंत्रपणे सांगितले.
- दहशतवादाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे, असे मोदी म्हणाले. काश्मीर प्रश्नावर मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत, भारताची भूमिका आम्हाला माहिती आहे, परंतु प्रथम आपल्याला मोदी यांचे म्हणणे ऐकून घ्यावयाचे आहे, सध्याची स्थिती चांगली नाही, त्यामध्ये बदल करावाच लागेल, असे मर्केल म्हणाल्या.
- भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जर्मनी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे जर्मनीने भारताकडे स्पष्ट केल्याचे शुक्रवारी सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
- ११ करारांवर स्वाक्षऱ्या
- भारत व जर्मनी यांनी द्विपक्षीय व बहुपक्षीय सहकार्य वाढवून दहशतवादाचा मुकाबला करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्याशी चर्चेनंतर दिली. दोन्ही नेत्यांनी पाचव्या आंतरसरकारी सल्लामसलत परिषदेत सहभागावेळी एकूण ११ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून एकूण पाच संयुक्त जाहीरनाम्यांना मंजुरी दिली आहे.