महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

4,701

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

महाराष्ट्राचे प्रामुख्याने तीन प्राकृतिक विभाग पडतात .

  1. कोकण किनारपट्टी 
  2.  पश्चिम घाट / सह्याद्री पर्वतरांग 
  3.  महाराष्ट्र पठार

कोकण किनारपट्टी 

निर्मिती : महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचला त्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे.

विस्तारउत्तरेस दमणगंगा नदी ते दक्षिणेस  तेरेखोल नदीपर्यंत 

लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :

  • कोकण  किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे.
  • कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते.
  • कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी  असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत ती आहे. 
  • क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.
  • कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्रकिनारा  रत्नागिरी  व सर्वात कमी समुद्रकिनारा ठाणे ला आहे

 रचना :

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

उपविभाग :

  • उत्तर कोकण  – शहरे विकसित वाहतुकीच्या सोई उपलब्ध .मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर
  • दक्षिण कोकण –  डोंगराळ व खडकाळ असल्यामुळे वाहतुकीच्या सोई कमी  रत्नागिरी व सिंधुदुर्ग

खलाटी:

  • पश्चिमेकडील अरबी समुद्र लगतच्या सखल भाग 
  •  उंची – 5 ते 15 मीटर ,उतार सौम्य आहे.
  • या भागात लहान मैदाने, खाड्या, वाळूचे दांडे,  खाजणे, चौपाटी तसेच समुद्रलाटांनी तयार केलेली भूरूपे आढळतात.

वलाटी :

  • कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वताकडील पायथ्यालगतच्या भागाला वलाटी असे म्हणतात.
  • उंची – 200 ते 300 मीटर असते, उतार तीव्र स्वरूपाचा आहे.
  • डोंगराळ भाग, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दऱ्याखोऱ्यांचा भाग 

खाडी:

  • नदी आपल्या प्रवासादरम्यान समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्याठिकाणी नदीचे पाणी समुद्रात जाऊन मिळतेच परंतु त्याच बरोबर समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत शिरत.
  • समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरते तिथपर्यंतच्या भागास खाडी असे म्हणतात. भारतातील पश्चिम किनारपट्टी चे खाडी हे वैशिष्ट्य आहे. खाडीचे पाणी निमखारे असते.

उत्तर कोकण  

  • पालघर : डहाणू, दातीवरा, वसई
  • ठाणे : ठाणे 
  • मुंबई शहर / उपनगर : मनोरी, मालाड, माहीम
  • रायगड जिल्हा : धरमतर, रोहा, पनवेल, राजपुरी, बाणकोट

दक्षिण कोकण

  • रत्नागिरी : केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापुर, विजयदुर्ग
  • सिंधुदुर्ग : देवगड, आचरा, कलावली, कर्ली, तेरेखोल

बंदरे :

  • कोकण किनारपट्टी ही दंतुर असल्याने कोकण किनारपट्टीवर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असंख्य नैसर्गिक बंदरे निर्माण झाली आहेत.
  • साधारणतः 49 बंदरे या कोकण किनारपट्टीवर असून मुंबई हे त्यातील प्रमुख बंदर होय.
  •  त्याचबरोबर अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, रायगड, रत्नागिरी इत्यादी लहान – मोठी बंदरे यावर आहेत.
  • मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच नाव्हा – सेवा हे बंदर उभारले आहे .

बेटे :

  • मुंबई हे कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे सात बेटांचा समूह मिळून तयार झालेले एक बेट आहे.
  • कासा, जंजिरा कुलाबा, खांदेरी, उंदेरी (रायगड), साष्टी, मढ, कुलाबा, छोटा कुलाबा, माजगाव, परळ, माहिम , कुरटे , अंजदीव, घारापुरी  बेटे पश्चिम किनार्‍यावर आहेत.

 पश्चिम घाट / सह्याद्री पर्वत 

विस्तार :

  • पश्‍चिम घाटाचा विस्तार उत्तरेस  तापी नदी खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यँत आहे.
  • महाराष्ट्रात पश्चिम घाटाचा विस्तार हा दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पर्यंत आहे.
  • पश्चिम दिशेने किनारपट्टी खचल्याने सह्याद्री पर्वत पश्चिमेस भिंतीसारखा सरळ किंवा अति तीव्र उताराचा दिसतो, तर पूर्वेस सह्याद्रीचा उतार मंद होत जातो.

लांबी आणि रुंदी :

  • एकूण लांबी 1600 किमी असून महाराष्ट्रातील लांबी 650 किमी लांब इतकी आहे.
  •  पश्चिम घाटाची  उंची 915 – 1220 मिटर एवढी सांगता येईल.
  • समुद्रकिनार्‍यापासून सह्याद्रीचे अंतर 30 – 60 किमी एवढी आहे.
  •  सह्याद्री पर्वतरांगेची रुंदी उत्तरेस जास्त असून, दक्षिणेस कमी दिसून येते.

सह्याद्री पर्वताचे वैशिष्ट्ये :

  • सह्याद्री पर्वताची बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उंची कमी झालेली आहे.
  • तर काही ठिकाणी बराच भाग उंच दिसून येतो. काही भागात पर्वताच्या उत्तर बऱ्याच ठिकाणी कमी आहे.
  • या पर्वताची पश्चिम बाजू तीव्र उताराची असून पूर्व भागाचा उतार अगदी सौम्य प्रकारचा आहे. तर काही ठिकाणी डोंगर माथ्यावर सपाटीकरणाचा भाग तयार झालेला आहे.
  • उदा:-  महाबळेश्वर, पाचगणी परिसर सपाट असा टेबल लँड म्हणून ओळखला जातो. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून सह्याद्री पर्वतावरील कास पठार (जिल्हा सातारा) महत्वपूर्ण आहे.

प्रमुख जलविभाजक : 

  •  महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून उत्तर-दक्षिण गेलेल्या या पर्वतरांगेवर महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रमुख नद्यांचे उगमस्थान आहे.
  • महाराष्ट्रातील या नद्यांची पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्या अशा गटात विभागणी केली जाते.
  • सह्याद्री पर्वतात उगम पावून पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या तर  सह्याद्रीमध्ये उगम पावून कोकण किनारपट्टी तून पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या. या अर्थाने त्यास महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हटला जातो.
  • त्याचबरोबर सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अशा रीतीने उभा आहे, की नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे त्याच्याद्वारे अडविले जाऊन सह्याद्रीचा पश्चिमेकडे अधिक पाऊस देतात, तर पश्‍चिम घाट/ सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर या मौसमी वार्‍यात कमी पाणी शिल्लक राहिल्याने सह्याद्रीच्या पूर्वेला पावसाचे प्रमाण कमी असते. 

घाट : 

  • सह्याद्री पर्वत कोकण व पठार यांच्यादरम्यान असल्याने कोकणातून पठारावर जाण्याकरिता सह्याद्री पर्वत ओलांडून जावे लागते.
  • याकरिता सह्याद्री पर्वताची उंची जेथे – जेथे कमी झालेली आहे, त्याठिकाणी घाटमार्ग तयार करण्यात आले आहेत.
घाटाचे नाव प्रमुख मार्ग
थळ/कसारा घाट मुंबई-नाशिक
बोरघाट मुंबई-पुणे
आंबा घाट कोल्हापूर-रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूर- पणजी
कुंभाली घाट कराड-चिपळूण
आंबोली घाट बेळगाव-सावंतवाडी
माळशेज घाट आळेफाटा-कल्याण
खंबाटकी घाट पुणे-सातारा
दिवा घाट पुणे-बारामती
वरंद घाट भोरे-महाड
चंदनपुरी घाट पुणे-नाशिक

सह्याद्री पर्वत उंची :

  • महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 मिटर आहे. परंतु सह्याद्री पर्वत सलग एकसारखा उंच नसून उत्तरेकडे सह्याद्री अधिक उंच आहे, तर दक्षिणेकडे सह्याद्रिची उंची कमी होत जाते. 
  • सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई असून ते अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरीजवळ आहे. परंतु प्रशासकीय दृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात असून त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे
शिखर  उंची (मीटरमध्ये) जिल्हा 
कळसुबाई  1646 अहमदनगर 
साल्हेर  1567 नाशिक 
महाबळेश्वर  1438 सातारा 
हरिश्चंद्रगड  1424 अहमदनगर 
सप्तशृंगी  1416 नाशिक 
तोरणा  1404 पुणे 
राजगड  1376 पुणे 
त्रंबकेश्वर  1304 नाशिक 
सिंगी  1293 नाशिक 
नाणेघाट  1264 अहमदनगर 
तौला  1231 नाशिक 
ताम्हणी  1226 पुणे 
गडलगट्टा  967 गडचिरोली 

 


महाराष्ट्र पठार :

  •  महाराष्ट्र पठाराने  महाराष्ट्राच्या भूमीपैकी 90 टक्के भूभाग व्यापलेला आहे.
  •  पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून ते पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यातील चिरोल टेकड्यांपर्यंत सुमारे 750 किमी रूंद, तर उत्तरेस सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस तिलादीपर्यंत सुमारे 700 किमी लांब आहे. महाराष्ट्र पठाराचे एकूण क्षेत्रफळ2.76 लाख चौरस. किमी इतके आहे.
  • सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण – पश्चिम भागात झालेल्या ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हा रसाचे थर एकमेकांवर साचून (सुमारे 40 थर) या पठाराची निर्मिती झाली आहे.
  • थरांच्या या रचनेला ‘डेक्कन ट्रॅप’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्र पठारावर असलेल्या लाव्हारसाच्या थरांची जाडी ही पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतांमध्ये अधिक तर पूर्वेला विदर्भाकडे कमी होत जाते. त्यामुळे पठाराची उंचीही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. म्हणजेच पठाराचा उतार हा पूर्वेकडे (आग्नेयेकडे) आहे. पठारावरून वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या खणन कार्यामुळे महाराष्ट्र पठारावर अनेक डोंगररांगा व नद्यांची खोरी निर्माण झाली.

महाराष्ट्र पठारावरील डोंगररांगा :

सातमाळा अजिंठा डोंगररांग :

  • सातमाळा अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी प्रमुख उपरांग आहे. 
  • सह्याद्री मधील नाशिक जिल्ह्यातील शिखरापासून पूर्वेकडे यवतमाळ जिल्हा पर्यंत विस्तार आहे
  • नाशिक जिल्ह्यात या रांगेला सातमाळची डोंगररांग म्हणून, तर पुढे औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याची डोंगररांग असे म्हणतात.
  •  या डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिम वाहिनी व दक्षिणेकडील गोदावरी या पूर्ववाहिनी नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहेत.

हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा :

  • अहमदनगर जिल्ह्यात या डोंगररांगेस हरिश्चंद्रगड असे म्हणतात. तर बीड जिल्ह्यात ही डोंगररांग बालाघाट  या नावाने ओळखली जाते.
  •  या डोंगररांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी गोदावरी व दक्षिणेकडील पूर्व वाहिनी भीमा नदी या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहे.
  • या डोंगररांगांवर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला आहे.
  •  हरिश्चंद्रगड या डोंगररांगेच्या दक्षिण दिशेला अहमदनगर पठार आहे. बालाघाट डोंगर रांगेच्या पश्चिमेला बालाघाट पठार आहे. तर  मांजरा नदीच्या खोऱ्यात मांजरा पठार आहे.

शंभू महादेव डोंगररांग : 

  • सह्याद्रीमधील महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे निघणारी शंभू-महादेव डोंगररांग महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटकात प्रवेश करते. 
  • या डोंगर रांगेवर वसलेल्या शिखरशिंगणापूर येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगर रांगेस शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात.
  • या डोंगर रांगेने उत्तरेकडे असणारी पूर्व वाहिनी भीमा व दक्षिणेकडे असणारी पूर्व वाहिनी कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहेत. या डोंगर रांगांच्या काही उपरांगा खालील प्रमाणे आहे.

पठारी प्रदेश :

  • शंभू महादेव डोंगर रांगेच्या पश्चिम दिशेला महाबळेश्वर व पाचगणी ही पठारे आहेत.
  • शंभू महादेवाच्या डोंगर रांगेच्या मध्यभागात औंध चे पठार आहे.
  • शंभू महादेवाचा डोंगर रांगेच्या दक्षिणेला  खानापूरचे पठार आहे व त्यापुढे सांगली जिल्ह्यात जत चे पठार आहे.
  • शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे.

सातपुडा पर्वत:

  • महाराष्ट्र पठाराच्या उत्तर सीमेवरून पूर्व-पश्चिम समांतर पसरलेली डोंगररांग म्हणजे सातपुडा पर्वत होय.
  • या पर्वतात एकामागे एक अशा सात डोंगररांगा किंवा सात पुडे 7 वळ्या 600 मीटर उंचीपर्यंत चढत जातात व उत्तरेस  नर्मदा नदीकडे एकदम खाली उतरताना दिसतात या रांगा एकमेकांना समांतर दिसतात. त्यावरून त्यास  सातपुडा असे म्हणतात. 
  • भारतातील हिमालया खालोखाल विंध्य सातपुडा हा प्रमुख जलोत्सारक पर्वत आहे.

सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा

तोरणमाळ डोंगररांग : 

  • ही रांग नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागापासून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून पश्चिम-पूर्व 100 किमी लांब पसरलेली आहे.
  •  या डोंगररांगेने उत्तरेकडील पश्चिम वाहिनी नदी नर्मदा व दक्षिणेकडील पश्चिम वाहिनी नदी तापी नदी  या दोन नद्यांची खोरी  वेगवेगळी केलेली आहेत.
  •  या डोंगररांगेवरील अस्तंभा डोंगर हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे त्याची उंची 1325 मी इतकी आहे.
  • या डोंगररांगेवर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ तोरणाच्या फुलांवरून आलेले नाव हे थंड हवेचे ठिकाण आहे व जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे.

गाविलगड डोंगर :

  • अमरावती जिल्ह्यातील वायव्य भागातील धारणी, चिखलदरा या तालुक्यांतून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगा गाविलगडच्या टेकड्या या नावाने ओळखतात. 
  • अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतांची पूर्व-पश्चिम लांबी 100 किमी आहे. 
  •  गाविलगड डोंगर रांग ही तापी नदी व पूर्णा नदी या दोन नद्यांच्या दरम्यान आहे.
  • गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर हे वैराट डोंगर असून त्याची उंची 1177 मीटर इतकी आहे. या डोंगररांगेवर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण 

सातपुडा पर्वतातील उंच शिखरे :

  • अस्तंभा डोंगर  – 1325 मीटर,  नंदुरबार
  • वैराट डोंगर  – 1177 मीटर , अमरावती
  • चिखलदरा  – 1118 मी. , अमरावती

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम