चालू घडामोडी – 8 सप्टेंबर 2019
आसाममध्ये ‘आफस्पा’ला 6 महिन्यांची मुदतवाढ :
- आसाममधील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर, राज्यातील सशस्त्र दले विशेषाधिकार कायद्याची (आफस्पा) मुदत 28 ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली असल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- तर सुरक्षा दलांना मोहिमा राबवण्याचा, झडती घेण्याचा आणि कुणालाही पूर्वसूचनेशिवाय अटक करण्याचा अधिकार देणारा हा कायदा नोव्हेंबर 1990 पासून आसाममध्ये लागू आहे.
- आसाममधील गेल्या सहा महिन्यांतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावी घेतल्यानंतर, राज्याच्या गृह आणि राजकीय विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे आणि आफस्पाच्या कलम 3 नुसार, राज्य सरकारने आसामला 28 ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी (आधी मागे न घेण्यात आल्यास) ‘अशांत क्षेत्र’ जाहीर केले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
गगनयानसाठी प्राथमिक निवड प्रक्रिया पूर्ण :
- भारतीय व्यक्तीस अवकाशात पाठवण्याच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अवकाशवीरांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा भारतीय हवाई दलाने पूर्ण केला असून त्यात टेस्ट पायलट (वैमानिकां)ची निवड करण्यात आली आहे.
- तर या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या, रेडिओलॉजी चाचण्या, प्रयोगशाळेतील चाचण्या, वैद्यकीय चाचण्या, मानसिक चाचण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.
- प्राथमिक टप्प्यात 25 जणांची निवड केली असून यातून आणखी चाळण्या लावून 2-3 संभाव्य अवकाशवीरांची निवड केली जाणार आहे.
- तसेच यातून निवड केलेल्या व्यक्तींना नोव्हेंबरनंतर प्रशिक्षणासाठी रशियात पाठवले जाणार आहे.
बियांकानं मिळवलं पहिलंवहिलं ‘ग्रँडस्लॅम’
- कारकीर्दीतील 24व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे स्वप्न 15 व्या मानांकित कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कू हिच्यामुळे भंग पावले.
- तर बियांकाने अंतिम फेरीत सेरेनाला 6-3, 7-5 असे पराभूत केले.
- तसेच पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने सुरूवातीचे गेम जिंकत सामन्यातील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण बियांकाने आपली लय कायम राखत सरळ दुसरा सेटही जिंकला.
- तर या विजयासह बियांका आंद्रेस्कूने कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
इस्रोचं नासाकडून कौतुक भविष्यात सोबत काम करण्याची तयारी :
- चंद्राच्या जमिनीपासून अवघ्या काही अंतराच्या उंचीवर असताना चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला अन् त्याचसोबत कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोकाही चुकला.
- तसेच संपर्क तुटला असला तरीही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-2 मोहिमेचे आणि शास्त्रज्ञांच्या ध्येयवाद व चिकाटीचे जगभरातील अनेक देशांकडून, नागरिकांकडून कौतुक केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अशातच जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही इस्रोच्या या दैदिप्यमान कामगिरीची दखल घेतलीये.
- “चांद्रयान मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे”, अशा शब्दांमध्ये नासाने इस्रोचं आणि भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. याशिवाय भविष्यात अंतरळामध्ये संयुक्तरित्या काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
- तर दरम्यान, “चांद्रयान-2 मोहिमेची 95 टक्के उद्दिष्ट्ये साध्य झाली आहेत. लँडर चांद्रभूमीवर सुरक्षित उतरू शकले नाही, बाब गौण आहे,” अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी दिली आहे.
- तर, इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी पुढचे 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी स्पष्ट केले आहे.