व्यक्तीविशेष :पंजाबराव देशमुख

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
327

द्विभाषिकापासून संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी सर्वपक्षीय महाराष्ट्रवादी नेते हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंडयाखाली एकवटले असता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या महाराष्ट्रवादींपैकी डॉ. पंजाबराव देशमुख हे एक होत. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी श्यामराव देशमुख या कष्टाळू शेतक-याच्या पोटी झाला. तसे पाहिले तर अत्रे व देशमुख तसे समवयस्क. अत्रे जन्मले पुणे जिल्ह्यातील सासवड गावी, तर पंजाबराव अमरावतीमधील पापळगावी. दोघांचीही घरची परिस्थिती यथातथा.

पदवीधर होईपर्यंत दोघांचीही परस्परांशी ओळखपाळख नव्हती. श्यामरावांनी शेती गहाण टाकून पंजाबरावांना उच्चशिक्षणासाठी लंडनला पाठवले, तर अत्रे टी. डी. होण्यासाठी लंडनला गेले. एम. ए. संस्कृत व बॅरिस्टर झाल्यावर त्यांनी पीएच.डी.साठी संशोधन सुरू केले. याच दरम्यान अत्रे मुंबई विद्यापीठात बी.टी.ला सर्वप्रथम लंडनला टीडीच्या प्रशिक्षणासाठी आले. तेव्हा त्यांची देशमुखांशी १९२७च्या सुमारास गाठ पडली. दोघेही पदवी घेऊन भारतात परतले.

तेव्हा दोघांच्याही डोक्यावर कर्ज होते. दोघांचाही आंतरजातीय विवाह झाला. देशमुखांच्या विवाहास प्रबोधनकार ठाकरे यांचे पाठबळ होते. तर अत्रे यांच्या आंतरजातीय विवाहाबद्दल डॉ. आंबेडकरांनी आपल्या नियतकालिकामधून अभिनंदन केले. दोघांनाही दलित बहुजनांचा कळवळा. नोव्हेंबर १९२७ मध्ये लग्नात व वडिलांच्या श्राद्धदिनी देशमुखांनी दलितांना सन्मानाने जेवू घातले.

कँप एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक असताना, अत्रे यांनी शाळेच्या वार्षिकोत्सवात अठरापगड जातीधर्माच्या मुलांसह भोजन केले. अंबामंदिर खुले करण्यासाठी आंबेडकरांच्या उपस्थितीत परिषद घेतली. पुढे अत्र्यांनी समतानंद अनंत हरि गद्रे यांच्या सहकार्याने जाती भेद निर्मूलनासाठी रत्नागिरी, पुणे-मुंबई येथे दलित सवर्णाचे झुणका-भाकर आयोजित केले. नंतरच्या काळात अत्रे यांनी आपल्या ‘महात्मा फुले’ चित्रपटाचा मुहूर्त डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते केला.

१९२८ साली, अमरावती जिल्हा परिषदेवर देशमुख अध्यक्ष म्हणून निवडून आले. तेथे त्यांना संसदीय प्रणालीचे बाळकडू मिळाले. गांधीजींच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवले. १९३० साली तत्कालीन मध्य प्रदेश विधिमंडळाचे आमदार झाल्यावर ते शिक्षण व कृषिमंत्री झाले. १९३३ साली, हरिजन सेवक संघाच्या कार्यासाठी गांधीजींबरोबर वऱ्हाड प्रांताचा दौरा केला. पुढे मराठी साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेल्या वि. भि. कोलते व कुसुमावती देशपांडे यांच्या प्राध्यापक म्हणून नियुक्तीस देशमुखांनी मंत्री म्हणून मान्यता दिली. कृषिहितार्थ ‘कर्जलवाद कायदा’ त्यांनी मान्य करून घेतला आणि शेतक-यांच्या कर्जनिवारणाची वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९३६ साली, विदर्भवासी ब्राम्हणेतर युवकांची परिषद प्रबोधनकार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली भरवली.

१९३८च्या आमदारकीच्या निवडणुकीत देशमुख पराभूत झाले. याच सुमारास काँग्रेसतर्फे पुणे नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर, अत्रे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि पुण्यात सुधारणा करण्याचा धडाका लावला. भांबुर्डा स्टेशनचे ‘शिवाजी नगर, रे मार्केटची ‘फुले मंडई’ करून पीएमटी सेवा सुरू केली.

१९३९ व १९४२ साली झालेल्या ‘मराठी परिषदांमध्ये जागतिक’ युद्धात इंग्रजांना पाठिंबा देण्यास नकार दिला. स्वत: स्थापिलेल्या अमरावतीच्या शिवाजी हायस्कूल व श्रद्धानंद अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेण्यास देशमुखांनी प्रेरित केले. मुंबईत झालेल्या या आंदोलनात अत्रे यांचे ‘चले जाव’ हे काव्य प्रेरणागीत ठरले.

१९४५च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी, तत्कालीन शेतकरी संघात ‘भाऊसाहेब’ म्हणून लोकप्रिय असलेल्या देशमुखांनी आपला प्राणप्रिय ‘शेतकरी संघ’ काँग्रेसमध्ये विलीन केला. जिल्हा परिषद इमारतीसमोर सुभाषचंद्र बोस व क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पुतळे देशमुखांनी उभारून समकालीनांची थोरवी ओळखणा-या आपल्या उदार मनाची साक्ष अप्रत्यक्षरीत्या जनतेला दिली.

१९४६-५० दरम्यान घटना समितीत काम करताना, देशातील सर्व जाती धर्मियांना समान न्याय देण्यासाठी देशमुखांनी ५०० दुरुस्त्या सुचविल्याबद्दल डॉ. आंबेडकरांनी त्यांची प्रशंसा केली. १९४९ साली शिवडी मतदार संघातून, अत्रे मुंबई नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटास राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मुंबई नगरपालिकेने त्यांचा नागरी सत्कार केला.

१९५२ ते १९६२ दरम्यान देशमुख अमरावतीचे खासदार म्हणून निवडून आले आणि देशाचे अन्नमंत्री म्हणून कार्यरत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १९५७ साली आचार्य अत्रे गिरगाव मतदार संघातून तर १९६२ साली दादर मतदार संघातून विधान सभेवर निवडून आले. ‘खेडे हा घटक आणि मराठी भाषिक सलगता’ या तत्त्वांवर महाराष्ट्र निर्माण व्हावा यास्तव झालेल्या आंदोलनसमयी इतर विदर्भ काँग्रेस नेते वेगळया विदर्भाची मागणी करत असताना, तत्कालीन नागपूर करारावर देशमुखांनी सही करून आपले महाराष्ट्र वादित्व सिद्ध केले.

आपल्या समाजवादी व पुरोगामी विचारांनी त्यांनी कैकवेळा लोकांना प्रभावित केले होते. गाडगेबाबांच्या महान सेवाकार्यापुढे प्रसंगी त्यांना नतमस्तक झालेले लोकांनी पाहिले. तसे अत्रे देखील गाडगेबाबांचे भक्त. त्यांचे कीर्तन मुंबईत असो वा पुण्यात, ते ऐकण्यास अत्रे मात्र हजर. त्यांनी आपल्या ‘म. फुले’ चित्रपटाचा आरंभ गाडगेबाबांच्या कीर्तनाने केला.

१९५३ साली स्त्री शिक्षणास पुरक ठरण्यासाठी देशमुखांनी कन्या वस्तिगृहाची शाखा विदर्भात सुरू केली. तर दोन दशकापूर्वी पुण्यात अत्रे यांनी मुलींसाठी आगरकर हायस्कूल सुरू केले. याच दरम्यान स्त्री समस्यांवर प्रकाश टाकणारी ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’ व ‘जग काय म्हणेल’ ही नाटके लिहून अत्रे यांनी मराठी रंगभूमी गाजवली.

देशमुख व अत्रे या उभयतांचे, आपल्या चारचाकीच्या चालकावर मनापासून प्रेम. चालकाच्या शिदोरीतील भाकरचटणी ओरपण्यास देशमुख मागेपुढे पाहत नसत. तर अत्रे यांनी बाबू ड्रायव्हरच्या निधनानंतर ‘माझा बाबू गेला’ हा हृद्य मृत्यूलेख लिहून त्याच्याप्रती जगावेगळे प्रेम नि कृतज्ञता व्यक्त केली.

अशा त-हेने देशमुख व अत्रे हे ‘समाजवादी व पुरोगामी’ विचारांचा समान धागा जपत काहीसे भिन्न पण समांतर मार्गाने जाणारे भारतीय राजकारणाचे लोकहितैषी सहप्रवासी ठरले. त्यासाठी देशमुखांनी ‘महाराष्ट्र केसरी’, तर अत्र्यांनी ‘नवयुग मराठा’ या आपल्या नियतकालिकांद्वारे लोकसंवाद साधला.

१९६५च्या ९ एप्रिलचा तो दिवस! दिवसभर लोकसभा- कामकाजामुळे देशमुख काहीसे थकले होते. उत्तररात्री आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन देशमुखांनी आपला ग्रंथ आटोपता घेतला. अशातऱ्हेने ‘भाऊसाहेबांसारखा’ महाराष्ट्रवादी विदर्भवीर गेल्याने व्यथित होऊन, त्यावेळी कर्मवीर पंजाबराव या दै. मराठातील मृत्यूलेखात आचार्य अत्रे म्हणतात, ‘डॉ. पंजाबरावांच्या मृत्यूने श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचा प्राणच नाहीसा झालाय.

अमरावती विद्यापीठ स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. मराठी व भारतीय समाजाच्या हितासाठी प्रसंगी देशीविदेशी संचार केला. बहुजन समाजाच्या उद्धारार्थ घेतलेले व्रत अखेपर्यंत जोपासले. अखेर त्यांच्या रूपाने एक लोकहितवादी वादळ शमले

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम