MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

117

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर्षी कोरोनामुळे परीक्षा न देऊ शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्याचं आश्वासन दिलं आहे (Uday Samant on age limit for MPSC UPSC candidates).

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे. याचा फटका शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षेंसोबतच युपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती त्यांच्या इथून मागील मेहनतीवर पाणी पडणार आहे. याचाच विचार करुन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर्षी कोरोनामुळे परीक्षा न देऊ शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्याचं आश्वासन दिलं आहे (Uday Samant on age limit for MPSC UPSC candidates).

उदय सामंत म्हणाले, “यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी एक वयोमर्यादा ठरलेली असते. मात्र राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा होणार की नाही याबद्दल साशंकता आहे. जर यावर्षी कोरोनामुळे या परीक्षा रद्द झाल्या, तर या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांच्यावर अन्याय होईल. या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता यावी यासाठी त्यांची वयोमर्यादा 1 वर्ष वाढवून देणं आवश्यक आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करेल.”

उदय सामंत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 1 वर्ष वाढ करण्याचा निर्णय झाल्यास हा मोठा दिलासा असणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी घेऊन अनेक वर्षे सातत्याने अभ्यास करत असतात. त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतात. अशावेळी त्यांच्यासाठी परीक्षेची प्रत्येक संधी महत्त्वाची असते. त्यामुळेच 1 वर्षाची मुदतवाढ मिळाल्यास असे विद्यार्थी पुढील वर्षी आपलं भविष्य आजमावू शकणार आहेत.

दरम्यान, यावर्षी कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे अकरावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. तसेच इतर परीक्षा देखील होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एकूणच कोरोनाच्या संकटाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावरही मोठा परिणाम केल्याचं पाहायला मिळत आहे.

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम